उत्तर प्रदेशात १७ नवजात बालकांचे नामकरण ‘सिंदूर’!   

पाकिस्तानला धडा शिकविणार्‍या जवानांना सलाम

लखनऊ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. याच ऑपरेशन सिंदूरच्या यशाने प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात किमान १७ नवजात बालकांचे नाव ‘सिंदूर’ ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान ९ आणि १० मे रोजी यातील बहुतेक नवजात बालकांचा जन्म झाला.
 
कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये १० आणि ११ मे रोजी जन्मलेल्या १७ नवजात मुलींचे नाव त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर ठेवले आहे, असे प्राचार्य डॉ. आर.के. शाही यांनी सांगितले.

सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ 

आपल्या शूर जवानांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याच्या दोन दिवसांनी, ९ मे रोजी माझ्या बाळाचा जन्म झाला. आपल्या सीमांचे रक्षण करणार्‍या शूर सैनिकांचे मी आभार मानू इच्छिते. सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ मी माझ्या मुलीचे नाव ‘सिंदूर’ ठेवले आहे, असे नेहा गुप्ता यांनी सांगितले. 

सिंदूर आता धैर्याचे प्रतिक

माझ्या बाळाच्या जन्मापूर्वीच, मी ठरवले होते की, त्याचे किंवा तिचे नाव सिंदूर ठेवायचे. कारण ते आता धैर्याचे प्रतीक बनले आहे, असे भेदिहारी गावातील अर्चना यांनी सांगितले. त्यांचे पती अजित म्हणाले, हे नाव राष्ट्रीय अभिमान पुन्हा निर्माण करणार्‍या जवानांचा सन्मान आहे. सैनिकांमुळेच आपण येथे सुरक्षित आहोत, त्यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी आपण कमीत कमी हे तर करू शकतो.
 

Related Articles